Saturday, 11 January 2014

पुरुषाने 'इंजेक्ट' करावी स्त्री'ची सहनशीलता! -- संजय पवार

चतुरंग, लोकसत्ता -१६ नोव्हेंबर २०१३ 
काळाच्या ओघात एकमेकांच्या मागेपुढे असलेले स्त्री-पुरुष आता एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत आणि शतकानुशतकं स्वाभाविक म्हणून जपलेली सहनशीलता, सहिष्णुता वा 'टॉलरन्स' स्त्रीला जाचक वाटू लागलाय. तर स्त्रीची ही निर्भयता पुरुषाच्या सहनशक्तीच्या बाहेर जाऊ लागलीय! काय असेल भवितव्य समाजाचं? आजच्या 
(१६ नोव्हेंबर) जागतिक सहिष्णुता दिनानिमित्ताने भारतीय समाजव्यवस्थेचा आणि पर्यायाने स्त्रीच्या सहनशीलतेच्या इतिहासाचा हा धांडोळा.
जगाची निर्मिती झाली आणि परमेश्वराने प्रथम पुरुष घडवला! पुरुष प्राधान्य सुरू झालं ते इथपासूनच. किंबहुना 'ईश्वर' सुद्धा 'पुरुष' म्हणूनच गृहीत धरला गेलाय. 'देवी' वगैरे गोष्टी नंतर आल्या. तर जगात आला तेव्हा पुरुष एकटाच आला. मग त्याचं त्या सुप्रसिद्ध बागेत हिंडून, फिरून, दमून झालं. लवकरच त्याची या सगळ्यातली उत्सुकता संपली. एखाद्या गोष्टीतली उत्सुकता पटकन संपणे ही पुरुषी प्रवृत्ती, परंपरा आजही अखंड, अविरत चालू आहे. मग परमेश्वराने त्याचीच एक बरगडी मोडून 'स्त्री' तयार केली! ती मुख्यत: त्याचा कंटाळा घालवण्यासाठी. त्याचं मनोरंजन करण्यासाठी वगैरे. हे म्हणजे मुलगा मोठा झाला, दुसऱ्या गावात 'खोली' घेऊन नोकरी करू लागला की त्याची (विविध अंगाने) उपासमार होऊ नये म्हणून तातडीने वधू संशोधन करून लग्न लावून देण्यासारखं झालं. परमेश्वरानेच 'स्त्री'चे दुय्यमत्व आधोरेखित केल्याने पुढे परमेश्वराला मानणाऱ्यांनी तोच कित्ता गिरवला. माझ्या एका मैत्रिणीची आजी परमेश्वराच्या या दुजाभावाला सांकेतिक देशी भाषेत सांगताना म्हणायची, 'बाई बनवताना माती कमी पडली!'

पुढे ती सफरचंदाची कहाणी आणि पुनरुत्पादन ही दंतकथा आता सर्वज्ञात आहे. टोळी काळात 'मादी'मुळे सैन्य तयार करता येतं हे कळल्यामुळे टोळी युद्धात लुटीमध्ये 'मादी' ही पण इतर वस्तूसारखी 'लुटून' न्यायची गोष्ट झाली. ही परंपरा राजे-रजवाडे ते आता अगदी एकविसाव्या शतकातल्या युद्ध दंगली यातसुद्धा 'मर्दुमकी' गाजवण्यासाठी स्त्रियांवर पाशवी बलात्कार केले जातात.
या सर्व प्रवासात परमेश्वरापेक्षा वेगळा विचार करणारे पुरुषही तयार झाले! त्यांनी 'स्त्री'ची ताकद ओळखली, तिच्यातली सृजनशीलता जोखली. मुख्य म्हणजे दलित, पशू यांसोबत निव्वळ झोडण्याची वस्तू म्हणून तिची जी ओळख धर्मशास्त्र, स्मृती यातून दिली होती, ते झिडकारून तिला 'माणूस' म्हणून बरोबरीचं स्थान देण्यासाठी या पुरुषांनी (नंतर त्यांच्याबरोबर काही स्त्रियांनीही) समाजाच्या तीव्र विरोध, निंदानालस्ती, चारित्र्यहनन यांना सहन करत स्त्रीला 'शिक्षित' केली. विद्येची देवता म्हणून सरस्वती पुजणाऱ्या समाजात स्त्रीला शिक्षणाचा अधिकारच नव्हता! (सरस्वती कुठून शिकली कोण जाणे!) तो मिळवून दिला. सावित्रीबाई फुलेंनी! पुढे कर्वे, आगरकर, न्या. रानडे, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे वगैरे मोठी परंपरा निर्माण झाली. हाच आलेख मग चढत गेला आणि बाई शिकू लागली. लिहू लागली आणि बोलू लागली. इथपर्यंत पोहोचला आणि तिथेच नवी ठिणगी पडली!..
सती, बालविवाह, केशवपन, विधवा विवाह बंदी, विधवांना धार्मिक कार्यक्रमातून वगळणे त्यांच्या खाण्यापिण्यावर, नेसण्यावर र्निबध असल्या अमानवी रूढी परंपरा सोयीस्कर विसरून, बाई शिकू लागली, लिहू लागली याचं, स्त्री शिक्षणाचं कौतुक सुरू झालं! जणू काही हे बदल रात्र सरून दिवस उगवावा इतके सहज झाले!
तर साधारण एकोणीसाव्या, विसाव्या शतकातच बाई/स्त्री बोलू लागली. आपल्या दुय्यमत्वावर, चूल आणि मूल या बंधनावर, धर्मग्रंथाच्या आधारे (यात सर्वच धर्म आले) स्त्रियांवर विविध बंधने लादणे याबद्दल बोलू लागली. मग या स्त्रियांनी धर्मग्रंथासह महाकाव्यांनाही तपासायला सुरुवात केली आणि सीता व द्रौपदी यांची 'स्त्री' दृष्टिकोनातून मांडणी होऊ लागली. एकूणच इतिहास, नीती, राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा या सगळ्याच क्षेत्रांत स्त्री आपला साक्षर तंत्रनिपुण सहभाग वाढवू लागली आणि पुरुषी दृष्टिकोनातून तयार केलेल्या 'स्त्री' प्रतिमांचे भंजन होऊ लागले. त्यातूनच पुढे कुटुंब, लग्न, संस्था याची फेरमांडणी होऊ लागली. स्त्रीत्वाच्या पारंपरिक प्रतिमांना छेद देताना, बंडखोरी म्हणून कुंकू, मंगळसूत्र अशा प्रतीकांना गुलामीची चिन्हे ठरवून बाद केली गेली. ज्यावर आजही गहजब चालू आहे. जसजसा शिक्षण व नैपुण्याने स्त्री पुरुषांसोबत सर्वच क्षेत्रात वावरत आज एकविसाव्या शतकात पुरुषाच्या बरोबरीने तर काही ठिकाणी त्यांच्या पुढे गेलेली स्त्री आता आंधळेपणाने, परंपरेने, रीतीरिवाज म्हणून गोष्टी स्वीकारण्यापेक्षा, उचित सवाल करून औचित्याचे आणि कालसुसंगतीचे मुद्दे मांडत आत्मविश्वासाने 'नकाराधिकार' वापरू लागलीय. यातूनच सहजीवन, लिव्ह इन, लग्नाशिवाय राहणे, लग्नाशिवाय मूल होऊ देणे, पितृत्व जाहीर न करणे, लग्नाशिवाय राहून मूल दत्तक घेणे, मूल नको हा अधिकार वापरणे या गोष्टी आता (नाकं मुरडत का होईना) समलैंगिक संबंधासोबत समजाने स्वीकारलेत!
आता या सर्व प्रवासात सर्वसाधारण पुरुषाची काय भूमिका होती? स्त्री शिक्षणास आजही विरोध दिसतो. महानगरं, शहरं यात बदलत्या राहणीमानानुसार (साधारण ६०व्या दशकापासून) 'शिकलेली बायको'चा भाव लग्नाच्या बाजारात वाढला आणि आणि आज तो अनिवार्य झालाय म्हणून 'शिकवलं' जातंय. यातही पूर्वी शिक्षण, नर्सिग असे 'सुरक्षित' क्षेत्रच प्रामुख्याने नोकरीसाठी निवडले जायचे आणि आज कुठल्याही क्षेत्रात स्त्री नाही असं नाही. तिच्या कामाच्या वेळाही पुरुषांप्रमाणेच चोवीस तासांतल्या कुठल्याही असू शकतात.
गंमत अशी आहे, संसाराला हातभार म्हणून प्रथम बाईचं अर्थार्जन स्वीकारणारा पुरुष 'मुलं' झाल्यावर मात्र त्या कमाईवर 'पाणी' सोडून बाईला चूल आणि मूल चक्रात अडकवता झाला. यात 'स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता' असे स्त्रीच्या लैंगिक इच्छांचे दमन करणारे आणि मातृत्वाचं गोंडस लेबल लावून तिला देवत्व देण्याचं काम पुरुषाने चलाखीने केलं! स्त्री ही तिच्यातल्या नैसर्गिक ऊर्मीचा सन्मान समजत या भूलथापांना फसली. त्यातूनच 'स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी' असं सुभाषित जन्माला आलं, पण मग आईविना 'भिकारी' होणारा स्वामी, मरेपर्यंत ओळखला जातो तो मात्र बापाच्या आणि बापाच्याच आडनावाने! हे कसं काय? हे ना कुठली स्त्री विचारत ना पुरुष!
शिकलेली, कमावती बायको हवी असली तरी पुरुषाच्या तिच्याकडून अपेक्षा मात्र कायम पारंपरिक राहिल्यात ते आजतागायत. आजही 'होम मिनिस्टर'सारख्या कार्यक्रमांतून दिसणारे तरुण तिने माझ्या आईवडिलांचा मान राखावा, त्यांचं ऐकावं, ते म्हणतात ते करावं असं म्हणत उघडपणे बायकोचं घरातलं दुय्यम स्थान हसत हसत अधोरेखित करतात. मुलीचे आईवडीलही मुलीने मान वाकवून अपमान स्वीकारत नांदावं अशीच पारंपरिक अपेक्षा ठेवतात, मग ती कुटुंबं, उच्चविद्याविभूषित असोत की अशिक्षित!
स्त्रीने संघर्ष करून मिळवलेल्या स्थानाचा उपयोग प्रत्यक्ष स्त्रीपेक्षा आजही पुरुषप्रधान व्यवस्थाच करून घेतेय. मात्र 'पुरुष' स्त्रीच्या नव्या स्थानावर आदराने कमी, मत्सराने अधिक बघतो. कारण कायम जिला 'पायातली वहाण' समजतो ती मान वर करून चालते, आपली 'बॉस' असते, बायको असूनसुद्धा आपल्या इच्छांना नाही म्हणते, सप्तपदीला लाथ मारत घटस्फोट मागते, किंवा मैत्री करून नंतर लग्नाला नकार देते, 'स्व'तंत्र राहते, राहू शकते, आर्थिक गरजांपासून, लैंगिक गरजांपर्यंतचं सर्व स्वातंत्र्य उपभोगते, यातून परमेश्वराने त्याची जी बरगडी, त्याच्याच मनोरंजनासाठी मोडली होती ती बरगडीची जागा आता त्याला ठसठसते. तिथे तीव्र वेदना होतात. मेल इगो नावाचा व्हेटो, पुरुषी वृत्तीचा अंगभूत माज कवडीमोल होईल का या भीतीने आता तो हिंसक होऊ लागलाय. 'पुरुष' म्हणून आजवर असलेल्या 'प्रधान' स्थानालाच धक्का लागतोय, ते स्थानच नामेशेष होतंय का या विचाराने तो भयग्रस्त, मत्सरग्रस्त आणि विध्वंसक झालाय!

नीट बारकाईने पाहिलं तर असं लक्षात येईल, परमेश्वराच्या त्या बागेत निर्माण झाल्यापासून 'स्त्री' आपल्यावरच्या अनंत अनिष्ट रूढी, परंपरा, बंधन यांच्याशी लढा देत स्वयंपूर्णतेकडे सरकताना दिसेल तर याच काळात पुरुष मात्र 'स्त्री'च्या या लढाईतून निर्माण झालेल्या बायप्रॉडक्टवर आयताच डल्ला मारत राहिलाय! म्हणजे बघा 'पुरुषाला' जन्म देते स्त्रीच! त्या वेळच्या सर्व प्रसूतिवेदना सहन करते तीच! पण तिच्या पुनरुत्थानाच्या बदलत्या काळात, तिच्या सोबत राहून, तिचा त्रास वाटून घेण्यापेक्षा मिळणाऱ्या अंतिम फळाचा हाच हक्कदार किंवा वाटेकरी !
याची उदाहरणं बघा. स्त्री शिक्षित झाली, ती अर्थार्जन करू लागली. त्याचा फायदा पुरुषाला झाला, कारण अनेक ठिकाणी तिचं उत्पन्न तो आपल्या हाती ठेवतो. मूल झाल्यावर करिअर, नोकरीला दुय्यम ठरवून हा आपली संतती, वंश यांना प्राधान्य देतो. नोकरीवर जाणाऱ्या स्त्रीच्या मुलाला सांभाळायला पाळणाघरं झाली, त्यामुळे पुरुषाला 'वंश'पण मिळाला आणि 'उत्पन्नही' चालू राहिले! नवऱ्याच्या करिअरसाठी स्वत:च्या  करिअरला तिलांजली देणाऱ्या स्त्रीला हा नियम, तर बायकोच्या         
 करिअरसाठी आपलं करिअर सोडणारा पुरुष अपवाद! गर्भनिरोधक साधनं वापरायला पुरुषांचा नकार आणि स्त्रीवर, तिच्या शरीरावर परिणाम करणाऱ्या औषधांचा वर्षांव!  
आता तर स्त्री सर्वच क्षेत्रांत वावरत असल्याने पुरुषाचा आणखीनच फायदा झाला! त्याला आता घरात उच्चविद्याविभूषित समाजात मिरवता येईल अशी आणि प्रसंगी मूल संगोपनासाठी करिअर सोडणारी बायको मिळू लागलीय आणि कामाच्या ठिकाणी मोकळ्या स्वभावाची, तात्पुरत्या नात्याची, व्यावसायिक हितसंबंधासाठी अनेकदा धोरणीपणाने त्याला साथ देणारी तशीच उच्चविद्याविभूषित आणि बऱ्याचदा सुंदर, आकर्षक अशी मैत्रीणही मिळू लागलीय! याचा कडेलोट म्हणजे अशा विवाहबाह्य़ संबंधावर रचल्या जाणाऱ्या छचोर मालिकांच्या प्रेक्षकांत सर्वसामान्य स्त्रियांसोबत वर उल्लेखलेली करिअर सोडलेली उच्चविद्याविभूषित स्त्री ही 'टाइमपास' म्हणत सहभागी झालेली असते!
थोडक्यात संघर्ष करून मिळवलेल्या स्थानाचा उपयोग प्रत्यक्ष स्त्रीपेक्षा आजही पुरुषप्रधान व्यवस्थाच करून घेतेय. पण आता मात्र 'पुरुष' स्त्रीच्या नव्या स्थानावर आदराने कमी, मत्सराने अधिक बघतो. कारण कायम जिला 'पायातली वहाण' समजतो ती मान वर करून चालते, आपली 'बॉस' असते, बायको असूनसुद्धा आपल्या इच्छांना नाही म्हणते, सप्तपदीला लाथ मारत घटस्फोट मागते, किंवा मैत्री करून नंतर लग्नाला नकार देते, 'स्व'तंत्र राहते, राहू शकते, आर्थिक गरजांपासून, लैंगिक गरजांपर्यंतचं सर्व स्वातंत्र्य उपभोगते. यातून परमेश्वराने त्याची जी बरगडी, त्याच्याच मनोरंजनासाठी, मोडली होती ती बरगडीची जागा आता त्याला ठसठसते. तिथे तीव्र वेदना होतात. मेल इगो नावाचा व्हेटो, पुरुषी वृत्तीचा अंगभूत माज कवडीमोल होईल का या भीतीने आता तो हिंसक होऊ लागलाय. 'पुरुष' म्हणून आजवर असलेल्या 'प्रधान' स्थानालाच धक्का लागतोय, ते स्थानच नामशेष होतंय का या विचाराने तो भयग्रस्त, मत्सरग्रस्त आणि विध्वंसक झालाय! 
स्त्रीसोबतच्या या प्रवासाचे वर्णन मी नेहमी पुढील काही हिंदी चित्रपट गीतांतून व्यक्त होणाऱ्या बदलत्या पुरुषी वृत्ती म्हणून करतो. पूर्वी पुरुषाला स्त्री लांबून दिसली तरी तो खूश असायचा. तिच्या प्रेमाची भीक मागायचा. ती नाही मिळाली तर प्रेमाच्या दु:खात दारूत बुडून 'देवदास' व्हायचा! त्यापुढे तो जरा वस्तुस्थिती स्वीकारून 'तुम अगर मुझको न चाहो तो काई बात नही, तुम किसी और को चाहोगी तो मुश्कील होगी', असं व्याकुळतेने म्हणायचा. त्यातूनही तिची आस जिवंत ठेवीत, आपलं हृदय विशाल करत तो म्हणू लागला 'कोई जब तुम्हारा हृदय तोड दे, तडपता हुआ कोई छोडदे तब तुम मेरे पास आना प्रिये, मेरा घर खुला है खुलाही रहेगा!' त्यानंतर स्त्री ही थोडी धीट झाली आणि वावर वाढवू लागली. तेव्हा पुरुष मूळ संशयी स्वभावाने, 'हमारे सिवा, तुम्हारे और कितने दिवाने है', असं म्हणू लागला आणि आता तर तो अत्यंत हिंस्र पद्धतीने 'तू है मेरी किरन' असा हक्क गाजवू लागला आहे. कालचक्र फिरत परत आता 'स्त्री' जिंकण्याची स्पर्धा पुरुषात पुन्हा सुरू झालीय!
काळाच्या ओघात एकमेकांच्या मागेपुढे असलेले स्त्री-पुरुष आता एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत आणि शतकानुशतकं स्वाभाविक म्हणून जपलेली सहनशीलता, सहिष्णुता वा टॉलरन्स स्त्रीला जाचक वाटू लागलाय. तर स्त्रीची ही निर्भयता पुरुषाच्या सहनशक्तीच्या बाहेर जाऊ लागलीय! त्यामुळे अनेकदा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते.
''स्त्रीची वेशभूषा पुरुषाला चाळवते, स्त्रीच्या अंतर्वस्त्राचं प्रदर्शन पुरुषाला उद्दीपित करतं, स्त्री या 'स्त्री'पणाचा फायदा घेत 'उत्कर्ष' साधतात किंवा त्याचाच आधार पुरुषाविरुद्ध तक्रार करून प्रचलित कायद्याच्या आधारे पुरुषाला बदनाम करतात. स्त्री आपलं 'स्त्रीत्व' गमावून 'पुरुषी' बनतेय. त्या लग्न संस्था, कुटुंब संस्थाच उद्ध्वस्त करताहेत, संस्कृती बिघडवताहेत.'' स्त्रियांवर अशासारखे आरोप आहेत पुरुषांचे आणि स्थितिवादी तथाकथित संस्कृतिरक्षक स्त्रियांचे, संघटना व विचारवंतांचेही! 
''तर आजही स्त्रीला दुय्यम वागणूक मिळते, स्त्री-भ्रूण हत्या, लग्नाच्या बाजारात धर्म, जात, रूढी, परंपरा यांचा बडेजाव, नोकरी/व्यवसायाच्या जागी लैंगिक शोषण, सार्वजनिक  जागी बलात्काराचे दडपण, पुरुषाचा सहजीवनात अल्प पुढाकार वा सहभाग, मूल नको म्हणणाऱ्या स्त्रीला पाषाणहृदयी ठरवून तिच्या स्त्रीत्वाबद्दलच शंका उपस्थित करणे, मासिक पाळीला आजही विटाळ मानणे, लग्न, मातृत्व म्हणजेच इतिकर्तव्यता याचा दबाव टाकणे, स्त्री स्वातंत्र्याला स्वैराचार मानून टिंगल करणे, टीका करणे, संस्कृती रक्षणाच्या नावाखाली स्त्रियांना ड्रेसकोड इथपासून ते डिस्को, पबमधून मारहाण करत बाहेर काढत धर्माभिमान दाखवणे' या आहेत आजच्या बदलत्या स्त्रीच्या पुरुषी आणि एकूणच व्यवस्थेविरुद्धच्या तक्रारी.
 आत्मसन्मानासाठी स्त्री आज पारंपरिक अर्थाने मिळणाऱ्या कुठल्याही रूढीग्रस्त मान-सन्मानांना तिलांजली द्यायला तयार आहे. पुरुष स्त्रीच्या नव्या स्थानाने अधिकाधिक हिंसक होताना दिसतोय तर स्त्री आजही समजूतदार, समन्वयाचीच भूमिका घेतेय. पुरुष मात्र त्या अर्थाने सहिष्णू व्हायला तयार नाही.  
यात मला नेहमीच स्त्री चळवळ आणि दलित चळवळ यांची तुलना करावीशी वाटते. दलित आणि स्त्रिया आपल्या व्यवस्थेत 'शूद्र' म्हणूनच गणल्या जात. फक्त चार दिवस सोडता स्त्री अस्पृश्य नव्हती! दलितांना शिक्षणाचा हक्क मिळाला, शिक्षणात, नोकऱ्यांत राखीव जागा मिळाल्या. गेल्या पाच दशकांत या वर्गात किमी लेयर तयार झाला. त्यांचे आंतरजातीय विवाह झाले, त्यांची संतती धर्मनिरपेक्ष, नव्या जागतिकीकरणाच्या वातावरणात (महानगरात) जातीविहीन आयुष्य जगतेय. तरीही एकदा जात, धर्म कळला की आजही मानसिकता तीच राहते. त्याच्या प्रकटीकरणाचे, आविष्काराचे दृश्यरूप बदललेय, पण कुठेतरी तो 'विषमतेचा' जीवाणू जिवंत आहे. हा जसा सनातन्यांचा प्रश्न तसाच या नवश्रीमंत, शहरी, सुस्थापित दलितांना आपण इथून पुढे कुठल्या संस्कृतीत जगायचे? महानगरी, जागतिक, भांडवलशाही, चंगळवादी आपलं साहित्य, संस्कृती यांची मापदंडं काय? आंतरजातीय विवाहातून जात/धर्म गळून गेलेत का की 'बापाची' जात/धर्म लावत आपण जुनीच 'री' ओढलीय? आज हा वर्ग अशा अनेक प्रश्नांच्या संभ्रमावस्थेत आहे. तशीच स्त्री चळवळही, स्त्री जगली! स्त्री शिकली, पुढे आली, स्वयंपूर्ण झाली. पण लग्न, कुटुंब संस्थेला नाकारताना पर्याय काय? किंवा स्वीकारली तर बदल काय? मातृत्वाचे पारंपरिक मॉडेल नाकारायचे तर नवे मॉडेल काय? नव्या समाजव्यवस्थेत एकत्र राहायचं की 'एकक'  करत एकत्र राहायचं? पुरुष बीजासाठी पूर्ण पुरुष न स्वीकारता केवळ बीज स्वीकारायचं? व्यक्तीनुरूप उत्तरं मिळतील ती प्रातिनिधिक नसतील, पण नव्या बदलाची सुरुवात असेल.    
एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभ्या ठाकलेल्या स्त्री-पुरुषांमध्ये आता शतकानुशतकाची स्त्रीची सहनशीलता पुरुषाने इजेक्ट करून आपला टॉलरन्स, सहिष्णुता वाढवली पाहिजे. हाच नैसर्गिक न्याय असेल! 

No comments:

Post a Comment